नोकरी सुरु होताच १५०००/- रुपये तुमच्या खात्यात येणारी योजना
देशात १ ऑगस्ट २०२५ पासून अनेक नवीन आर्थिक नियम लागू झाले असून भारत सरकारने ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना‘ (PM-VBRY) नावाची एक नवीन योजना आयुष्यात पहिली नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी सुरू करण्याची सर्वात महत्त्वाची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. सदरील योजनेअंतर्गत, पहिल्यांदाच नोकरी सुरू करणाऱ्या तरुणांना सरकारकडून आता १५,०००/- रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केलं आहे.
योजनेचं उद्दिष्ट आणि बजेट:- ही योजना पूर्वी ‘एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेन्टिव्ह (ELI)’ म्हणून ओळखली जात होती. पण, आता तिचे नाव बदलून PM-VBRY करण्यात आले आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट देशात ३.५ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण करणे आणि विशेषतः उत्पादन क्षेत्रात रोजगार वाढवणे हे आहे. यासाठी सरकारने पुढील चार वर्षांसाठी ९९,४४६ कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे.
तरुणांना १५,००० रुपयांची मदत कशी मिळणार ?
- जर तुम्हाला तुमची पहिली नोकरी मिळाली असेल.
- तुमचा मासिक पगार १ लाख रुपयांपेक्षा कमी असेल.
- तुम्ही ईपीएफओमध्ये (EPFO) नोंदणीकृत असाल.
- तर तुम्हाला सरकारकडून १५,००० रुपयांची मदत मिळेल.
हे पैसे दोन हप्त्यांमध्ये मिळतील: पहिला हप्ता ६ महिन्यांच्या नोकरीनंतर आणि दुसरा हप्ता १२ महिन्यांनंतर दिला जाईल. यासाठी तुम्हाला एक ‘आर्थिक साक्षरता अभ्यासक्रम’ पूर्ण करावा लागणार असून त्यानंतर ही रक्कम थेट तुमच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात जमा होईल.
योजनेचा कंपन्यांनाही मिळणार फायदा ..
या योजनेचा दुसरा भाग कंपन्यांसाठी आहे. जर एखाद्या कंपनीने नवीन लोकांना कामावर ठेवले, तर तिला प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी दरमहा ३,०००/- रुपये प्रोत्साहन मिळेल. पन्नास पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या लहान कंपन्यांना किमान २ नवीन लोकांना कामावर ठेवावे लागेल. मोठ्या कंपन्यांना ६ महिन्यांसाठी ५ नवीन लोकांना कामावर ठेवावे लागेल. हे प्रोत्साहन दोन वर्षांसाठी उपलब्ध असेल, तर उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांसाठी ते चार वर्षांपर्यंत मिळेल.
‘मेक इन इंडिया’लाही मिळणार चालना..
या योजनेचा उद्देश संघटित क्षेत्रात जास्तीत जास्त लोकांना नोकरी देऊन त्यांना पेन्शन आणि विमा यांसारखी सामाजिक सुरक्षा मिळावी हा आहे. १८-३५ वयोगटातील तरुणांना कुशल बनवण्यावर आणि लघु-मध्यम व्यवसायांना पाठिंबा देण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. या योजनेमुळे ‘मेक इन इंडिया’ मोहिमेलाही चालना मिळेल, ज्यामुळे भारत उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनविण्यास मदत होईल.
पंतप्रधान मोदींनी अलीकडेच रोजगार मेळाव्यात ५१ हजार नोकरी पत्रे वाटली होती. आता ही नवीन योजना त्या दिशेने टाकलेले आणखी एक मोठे पाऊल आहे. जर तुम्ही तुमची पहिली नोकरी सुरू करत असाल, तर फक्त ६ महिने काम करा आणि या योजनेचा पूर्ण फायदा घ्या !!
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!