मनोगत

प्रिय मित्रांनो,
संगणक युगात ग्रामीण भागातील युवकांनी सरकारी नोकरी व स्पर्धा परीक्षेत जास्तीत-जास्त संख्येने सहभागी होण्याकरिता उपलब्ध असलेल्या संधी त्यांच्यापर्यंत पोहचवून ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग सुलभ व्हावा म्हणून अतिशय प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीत ‘नोकरी मार्गदर्शन केंद्र’ ची स्थापना करत राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिलं नोकरी विषयक परिपूर्ण मराठी संकेतस्थळ विकसित करण्याचा मान आम्ही मिळविला आहे, त्याच बरोबर बेरोजगारांच्या मदतीसाठी संपूर्ण राज्यात जवळपास सातशेच्या वर मदत केंद्राची स्थापना करून सन २०१३ साली लावलेल्या एका छोट्याशा रोपट्याचं आज महाकाय वटवृक्षात रुपांतर झाले असून या वटवृक्षाच्या पारंब्या दिवसेंदिवस अवघ्या जगभरात पसरल्या जात आहेत. केवळ राज्य आणि देशातूनच नाही तर संपूर्ण जगभरात विखुरलेले लाखो बेरोजगार याचा लाभ घेऊन नोकरीच्या संधीच्या वाटेवर येत असल्याने महाराष्ट्रासह बीड सारख्या ग्रामीण जिल्ह्याची स्पर्धात्मक ओळख निर्माण होताना पाहून मनस्वी आनंद होत आहे. त्यामुळे भविष्यात बेरोजगारी निर्मुलन करण्याबरोबरच बेरोजगारांना संघटीत करून न्याय मागण्यासाठी संघर्ष करण्याचा आमचा मानस आहे.

बीड जिल्ह्यात असलेल्या माजलगाव तालुक्यातील माजलगाव- गढी रोडवरील धर्मेवाडी या साधारणतः पाचशे-सहाशे लोकवस्तीच्या छोट्याशा खेडेगावात माझा जन्म झाला असला तरी आणि आई- वडिलांचे शिक्षण केवळ चौथी पर्यंतच झाले असले तरी आपल्या तिन्ही मुलांनी खूप शिक्षण घेऊन किमान एका मुलाने तरी सरकारी नोकरी करून आपल्या जीवनाचे आणि केलेल्या कष्टांचे सार्थक करावे, असे स्वप्न उराशी बाळगून अतिशय काबाड- कष्ट करून संसारात झगडत- झगडत अगदी विश्वासाने आमच्या शिक्षणासाठी अटोकाट प्रयत्न करून दोन्ही मोठ्या भावांना क्रमशः वाणिज्य आणि विज्ञान शाखेतून पदवीपर्यंतचे आणि माझे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, दोन्ही भावांप्रमाणे मी सुद्धा पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करावे, यासाठी ते अपार प्रयत्न करत होते. मी मात्र दहावीच्या वर्गात १९९३ साली ३७.७१ टक्के एवढे गुण घेऊन अगदी काठावर कसाबसा पास होऊन त्यांच्या विश्वासास अपात्र ठरलो. त्यामुळे आपो-आपच पुढील उच्च शिक्षणाचे सर्व मार्ग स्वतःच बंद करून पुढे थेट ‘रोजगार हमी योजना’ च्या कामावर हजर झालो, आणि पुढील शिक्षणाला रामराम ठोकला तो कायमचाच. रोजगार हमी योजनेवर काम करताना आपली दयनीय अवस्था स्वतःलाच सहन न झाल्याने सुरुवातीला माजलगाव आणि नंतर गेवराई येथे मिळेल ते वेगवेगळे काम करून अनेक वाईट अनुभव घेत असतानाच १९९७ मध्ये बीड येथील ‘झुंजार नेता’ दैनिकात काम करण्याची एक सोनेरी संधी मला मिळाली. आदरणीय स्वर्गीय मोतीरामजी वरपे (दादा) यांच्या सहवासात राहून काही तरी नवीन करण्याची प्रेरणा मिळत गेली आणि स्वर्गीय रत्नाकरजी वरपे (भाऊ) यांच्या सहकार्याने २००४ साली प्रत्यक्षात उतरवून ‘नोकरी मार्गदर्शन केंद्र’ ची एका स्पर्धा परीक्षेच्या दुकानाच्या माध्यमातून स्थापना बीड सारख्या ग्रामीण भागातून केली. माझी संकल्पना नवीनच असल्याने त्यावेळी अनेकांची कुचेष्टा सहन करावी लागली असली तरी, आज आम्ही आकाशाला गवसणी घालण्या इतपत यश मिळविण्यात यशस्वी झालो आहोत, यात शंकाच नाही.

वयाच्या पस्तिसाव्या वर्षापर्यंत पराकोटीचे प्रयत्न करूनही दारोदार फिरताना नको वाटणाऱ्या जीवनातील झालेल्या वेदना आजही अगदी जिवंत आहेत. दहावी नंतर शिक्षण सोडण्याचा एक चुकीचा निर्णय आणि स्वतःची क्षमता कधी पडताळून पाहण्याची संधीच न मिळाल्याने ऐन उमेदीच्या काळातील तब्बल सतरा वर्ष केवळ भटकंती करण्यातच गेली. मात्र ‘आत्मविश्वास आणि प्रयत्न नेहमीच यशाकडे घेऊन जातात’ अशीच माझी परिस्थिती झाली असंच म्हणावं लागेल. स्वतः वर विश्वास ठेवा कारण प्रत्येकालाच एक संधी मिळत असते, मात्र मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी गरज आहे ती फक्त आपल्या जिद्द, कृती आणि इच्छा शक्तीची !!

आपला
महारुद्र माडेकर
संस्थापक – नौकरी मार्गदर्शन केंद्र



IMP
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});