राज्यातील आरोग्य विभागातील १७ हजार पदांची भरती लवकरच राबविणार

मुंबई : राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे यंत्रणेवर ताण पडत आहे. तसेच आगामी काळात येणाऱ्या करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागातील १०० टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली असून त्यानुसार चार हजार डॉक्टरांसह इतर विविध संवर्गातील एकूण १७ हजार पदांच्या जागा तातडीने भरण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली.

राज्यात करोना रुग्णांची संख्या अद्यापही अपेक्षेप्रमाणे कमी झालेली नाही. त्याचबरोबर जुलै- ऑगस्ट दरम्यान तिसरी लाट येण्याचा इशारा केंद्राने दिला आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर पडणारा ताण आणि पुढील काळातील अडचण लक्षात घेऊन भरतीचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती करोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर टोपे यांनी दिली आहे.

सध्या रुग्णसेवेशी निगडीत ५० टक्के पदभरतीला मान्यता होती. मात्र, वाढत असलेले करोनाचे रुग्ण पाहता १०० टक्के पदभरतीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या स्तरावर पदभरतीचा निर्णय घेण्यालाही मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.